चिखली प्रतिनिधी :
तालुक्यातील केळवद परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रोह्यांच्या (रानडुक्कर) हल्ल्यामुळे गहू पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे.
सात एकर गव्हाचे पीक धोक्यात
केळवद येथील शेतकरी उदय पाटील व सुनील रामराव पाटील यांनी सुमारे सात एकर क्षेत्रात गव्हाची लागवड केली होती. सध्या गहू पीक वोंब्याच्या अवस्थेत असताना रोह्यांनी शेतात घुसून मोठ्या प्रमाणावर पीक तुडवून टाकले.
यामध्ये जवळपास दोन एकर गहू पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कष्टाने उभे केलेले पीक काही क्षणात उद्ध्वस्त झाल्याने संबंधित शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिसरात वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नुकसान भरपाईची मागणी
वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा तसेच शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी उदय पाटील व सुनील रामराव पाटील यांनी केली आहे.
परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही वन्य प्राण्यांच्या वाढत्या संचारामुळे पिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Users Today : 34